Nurtureoneslife:
श्रीब्रह्मचैतन्य श्रीगोंदवलेकर महाराजांचा नामबोध
२२ जुलै २०२१ गुरुवार
गुरू आपल्याला अंतिम सुख दाखवितात.
आपण विषय मागत असतो आणि ते दिले तर आपण त्यात बुडून मरू हे गुरूंना माहीत असते; म्हणूनच गुरु आपल्याला त्यातून वाचविण्यासाठी चार गोष्टी सांगून पाहतो. आपण तेही न ऐकले, तर तो आपत्ती वगैरे आणून धाक दाखवितो. आपण त्याबद्दल रडत असलो तरी तो आपल्याला त्यातून वर ओढीतच असतो. आपण चांगले शिकले-सवरलेले; चांगले वयस्कर; तरीसुद्धा आपल्याला विषयात उडी घ्यावीशी वाटते. पण अंतिम सुख काय, हे गुरूला कळत असते. म्हणून तो सध्या दिसणाऱ्या सुखापासून आपल्याला परावृत्त करीत असतो. तेव्हा, आपण गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे. तो जे साधन सांगेल तेच करीत राहावे, म्हणजे आपल्याला अंतिम सुखाचा लाभ होईल. गुरू आज्ञा करतो म्हणजे काय करतो ? तर आपले मन जिथे गुंतले असेल तिथून त्याला काढण्याचा तो प्रयत्न करतो.
प्रापंचिक जन विषयप्राप्तीसाठी झटतात. पण विषय मागूनही जो देत नाही, त्यापासून परावृत्त करतो, तो संत.
॥ हरये नम: | हरये नम: | हरये नम: ||
श्रीब्रह्मचैतन्य श्रीगोंदवलेकर महाराजांचा नामबोध
२१ जुलै २०२१ बुधवार
वेदाप्रमाणे नामही अनादी, अनंत, अपौरुषेय आहे.
शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे की, कृतयुगामद्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये हवनाने आणि द्वापारयुगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होते. परंतु कलियुगामध्ये त्यांपैकीं काहीच साध्य होणे शक्य नसल्याने, भगवंताचे केवळ नाम घेतले असता मनुष्याला त्याचे दर्शन घडते. वेद भगवंताचे वर्णन करतात. नामदेखील भगवंताचेच अस्तित्व प्रकट करते. प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी 'हरिः ॐ' असते, ते नामच आहे. आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो, पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवितो. इतक्या तन्मयतेने नाम घ्या की, 'मी नाम घेतो आहे' हे सुद्धा विसरून जा.
इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल पण ते तात्पुरते असते. नामाने थोडा
उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचे साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते.
॥ हरये नम: | हरये नम: | हरये नम: ||
0 comments:
Post a Comment