5/04/2016

हितगुज

गुरुदेवांचे हितगुज-
“नारळाचे पाणी जितके गोड तितकी खोबऱ्याची चव कमी.”

“सत्य, आनंद, साक्षात्कार नि ईश्वरी प्रसाद ह्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. त्यांचे कधी निश्चितपणे वर्णन करणे शक्य नसते. शब्दातीत असा तो अवर्णनीय अनुभव असतो. त्याची व्याख्या करता येत नाही. अनुभव हा शिक्षणासारखा किंवा सांस्कृतिक साचेबंध साध्यप्रकार नाही. अनुभवाला भूतकाळ नसतो; ना भविष्यकाळ ! सर्वच वर्तमानकालीन ! आताच्या आता, या क्षणाला अनुभवाची ती गोष्ट आहे. साधनेमध्ये पायरीपायरीने शेवटला जायचे असते. त्यात संथ वा शीघ्र गती असते. कालाचे बंधन असते. अनुभव हा देता-घेता येत नाही. तो बक्षिसासारखा देता येत नाही. ज्ञानासारखा किंवा माहितीसारखा मिळविता येत नाही. किंवा शब्दांनी त्याचे स्वरूप जसेच्या तसे सार्थपणे स्पष्ट करता येत नाही. तो निव्वळ अभ्यास नाही की परीक्षा देऊन पास होता येईल.”
“समाधानाचे शास्त्र निराळेच आहे; तो अनुभव आहे. ईश्वर, सत्य, आनंद, ज्ञान, साक्षात्कार वा आत्मदर्शन या गोष्टी अनुभवाशिवाय कळल्या जाणल्या असे म्हणणे फोल आहे. ती निव्वळ अज्ञानांधकारात केलेली बौद्धिक कसरत होईल. पांडित्याचे, आपण घेतलेल्या शिक्षणाचे, केलेल्या पठंतीचे ते केवळ पोकळ नि अहंकार दंभाने भरलेले पुस्तकी ज्ञानाचे प्रदर्शन होईल. पेंढा भरलेला सिंह, सिंहासारखा दिसला तरी तो पशूंचा राजराजेंद्र होऊ शकत नाही. तीच स्थिती शाळा-कॅालेजातून मिळवलेल्या ज्ञानाची, त्यात मिळवलेल्या प्रावीण्याची. त्याने वरवरचे ज्ञान होईल. उदर भरण्याकरिता त्याचा उपयोग होईलही. नव्हे ते आवश्यकही ठरेल; पण त्याने अनुभवाचा ओझरता स्पर्श होणे शक्य नाही.”
“शिकलेला मनुष्य हा जास्त समाधानी असायचाच. नारळाचे पाणी जितके गोड तितकी खोबऱ्याची चव कमी. जेवढी विदवत्ता जास्त तेवढी निष्ठा कमी. विद्वान लोकांना कल्पना जास्त स्फुरतात. फार चिकित्सा करण्याने नुकसानच होते. म्हणून चिकित्सा मर्यादेत असावी. कल्पनेचे खरेखोटेपण अनुभवांती कळते म्हणून अनुभवांनंतर कल्पना थांबली पाहिजे.”
#जयशंकर