9/11/2020

7

श्रीराम  
सुप्रभात, 
न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः |
न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ||
(भगवत गीता अध्याय २रा श्लोक १२)
अर्थः असा काळ कधीच अस्तित्वात नव्हता जेव्हा तू मी व हे राज्य अस्तित्वात नव्हते आणि भविष्यातही असा काळ येणार नाही ज्यात आपण अस्तित्वरहीत होऊ.
तात्पर्यः सृजनहो अर्जुनाला कृष्ण सांगत आहेत की आपण सदैव आहोत आज आहोत कालही होतो अन उद्याही राहूया.
भगवंत विविध जीवांचे पालनकर्ता आहेत हे उपनिषदामध्ये सांगण्यात आले आहे. ते भगवंत प्रत्येक जीवाच्या ह्रदयामध्ये पूर्णांशरूपात स्थित आहेत. जे संत महात्मे त्या भगवंताला आत व बाहेर पाहू शकतात ते शांती प्राप्त करतात. 
येथे अर्जुनाला जे वैदिक सत्य सांगण्यात आलेले आहे ते केवळ अर्जुनच नाही तर अश्या प्रत्येक व्यक्तीला सांगितलेले आहे जो स्वतःला खूप विद्वान समजतो किंवा देखावा करतो. भगवान स्पष्टपणे सांगतात की ते स्वतः, अर्जुन व युद्धभूमीवर जमलेले इतर राजे या सर्वांचे अस्तित्व आहे. बद्ध किंवा मुक्त या अवस्थांमध्ये भगवंत सर्वांचे नित्य पालनकर्ते आहेत. ते नित्य शाश्वत आहेत. तसेच सर्वच शाश्वत आहेत त्यामुळे कुणाचाच शोक करण्याचे काहीच कारण नाही.  मोक्षानंतर जीवात्मा मायेच्या आवरणापासून अलग होतो आपले अस्तित्व गमावतो हे मायावादी तत्वज्ञान सांगते पण या सिद्धांताला सर्वश्रेष्ठ अधिकारी भगवंत पुष्टी देत नाहीत. तसेच आपण केवळ बद्धअवस्थेतच वैयक्तिक अस्तित्वाचा विचार करतो यालाही येथे पुष्टी मिळत नाही. 
भगवत गीता सामान्य साहित्या पेक्षा श्रेष्ठ आहे. तिची कोणत्याच पुस्तकाशी तुलना नाही. एखादा अभक्त जर तिला जाणण्याचा प्रयत्न करेल तर तो व्यर्थ ठरेल.
जे निर्माण होते ते नाश पावते आणि हे सर्व मायेमुळे दिसते नाहीतर आत्मा म्हणजे वस्तू ती तर अविनाशी आहे. आता माया म्हणजे मायेच्या हजार व्याख्या करता येतील माया म्हणून प्रेम, अज्ञान, 
माया ही शक्ती आहे शक्तीच्या दोन अवस्था एक शांत असणे दुसरी बाहेर टाकणे.  शांत अवस्थेला अरविंद self absorbing म्हणतात ईश्वर त्या शक्तीला गिळून ठेवतो शक्तीची दुसरी अवस्था तिला तो बाहेर टाकतो. त्यावेळी शक्तीला त्याच्या मंजूरीशिवाय कार्य करता येत नाही.

जसा वारा सुटल्यावर सरोवरातून तरंग आले आणि आपल्याला वाटते की काही निर्माण झाले  अरे पाणीच पाण्यातून आले पाण्यातच राहीले आणि पाण्यातच गेले नवीन काहीच नाही  मग यातून काय शिकायचे या जगात परमेश्वरराशिवाय कोणी नाही
 गीतेच्या चवथ्या अध्यायात सांगितल्यानुसार केवळ व केवळ भगवंताचा भक्तच तिला समजू शकतो व आपल्या आचरणात आणू शकतो.  

देहिनोSस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा |
तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति || 
(भगवत गीता अध्याय २रा श्लोक १३ वा)
जसा देह धारण केलेला आत्मा देहाला बालवयातून तारूण्यात व तारूण्यातून वृद्धपणात घेऊन जातो, तसाच मृत्यूनंतर जीवात्मा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करतो. तो अमर असतो.
तात्पर्यः आत्मा शरीर बदलत असतो कधी तो बालक कधी तरूण तर कधी वृद्धाचे रूप धारण करतो. पण हे बदल जीवात्म्यामध्ये नव्हे तर वरील नश्वर शरीरात होत असतात. शेवटी हा जीवात्मा मृत्यूझाल्यावर शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. जीवात्म्याला भोतिक असो वा आध्यात्मिक असो शरीर तर निश्चितपणे मिळतेच. त्यामुळे भीष्माचार्य व द्रोणाचार्यांसारख्या आप्तांसाठी अर्जुनाने शोक करण्याची आवश्यकता नव्हती. उलट ते वृद्ध शरीर सोडून नवीन शरीर घेतील यासाठी आनंदीत व्हायला हवे होते. आपण जी कर्म करत असतो त्यानुसार आपल्या या शरीराला सुख दुःख ही भोगावी लागत असतात. व त्यानुसार पुढील जन्मी आपल्याला भौतिक किंवा आध्यात्मिक शरीर प्राप्त होत असते. तर भीष्म व द्रोण तर महापुरूष होते त्यांना नक्कीच अध्यात्मिक शरीरच मिळणार होते किंवा स्वर्गप्राप्तीही होणे सहाजिक होते. असे असतांना शोक करणे व्यर्थ होते. 
ज्याप्रमाणे देहात आल्यावर आत्म्याला बाल्यावस्था लहानपण तरुणपण आणि वृधत्व येते त्याप्रमाणे दुसऱ्या देहाची प्राप्ती होते त्याविषयी विद्वानांना मोह होत नाही ..आत्म्याला हे स्वाभाविक आहे
आपले शरीर एकच असते पण वयपरत्वे त्यात भेद होत जातो हे प्रत्यक्ष दिसत असते पण प्रत्येक बदलाबरोबर शरीर नाहिसे होत नाही
अनेक जन्म आम्ही हेच करत आलो आहोत
जन्माला आलेला मृत्यू पावणारचआणि परमार्थ म्हणजे त्याच्याशी हात मिळवाणे म्हणजे shake hand with death 
या जगात दोनच माणसाला मृत्यूचे भय नसते  एक साधकाला दुसरे वीरपुरूषाला या दोघांनाच मान आहे एक संत जो आधीच मीपणाने मेलेला असतो  एक जो रणांगणात देह ठेवतो. 

ज्याला परमात्मा, जीवात्मा, आध्यात्मिक व भौतिक प्रकृतीचे ज्ञान आहे ती व्यक्ती धीरोदात्त असते किंवा ज्ञानी असते. व अश्याप्रकारच्या मानवी शरीरांच्या बदलाने गोंधळून जात नाही. 
जीवात्मा अविभाज्य आहे. त्याचे तुकडे करता येत नाहीत पण परिवर्तनिय आहे तर परमात्मा अविभाज्य तसेच अपरिवर्तनीय आहे. येथे श्रीकृष्ण परमात्मा आहे व अर्जुन मायेने मोहित झालेला जीवात्मा आहे.

 ॐराम कृष्ण हरी 
सौ.संगीता मोहोळकर

0 comments:

Post a Comment