साऱ्या जगाशी गोड वागत राहण्याइतकी मला सवड नाही ! -स्वामी विवेकानंद.
शिकागोची धर्मपरिषद झाल्यानंतर स्वामी विवेकानंद यांचा एका धर्मोपदेशकाशी काही कारणावरून खटका उडाला. तेव्हा त्या धर्मोपादेशकाच्या शिष्यांनी स्वमीजींशी वाद सुरु केले. या घटनेच्या निमित्ताने स्वामीजींनी काही गोष्टी अतिशय परखडपणे सांगितल्या. त्या गोष्टी त्यांनी सर्वांना उद्देशून एका पत्रात लिहिल्या. त्या पत्रातील सारांश ----
'एखादे काळे कुट्ट असत्य चालवून घेणे आणि त्यासाठी स्वतःला गोड वागायला शिकवणे, हे मी करू शकत नाही. पण मी ते करू शकत नाही यासाठी साऱ्या आयुष्यभर मी बरेच काही सोसत आलो आहे. पण तरीही मी तडजोड करू शकत नाही. मी माझ्या मनाला पुन्हा पुन्हा सांगून पहिले, पण मला ते जमत नाही. अखेर मी तो नाद सोडून दिला. परमेश्वर सर्वश्रेष्ट आहे. तो मला ढोंगी होऊ देणार नाही. मग त्याचा जो काही परिणाम व्हावयाचा असेल तो होवो. झाडून सर्वांचा संतोष होईल असा रस्ता मला सापडलेला नाही आणि मी जो काही आहे त्याहून निराळा होऊ शकत नाही. मी स्वतःशी प्रामाणिक आहे.
हे माझ्या मना, स्थिर राहा. मग परमेश्वर सदैव तुझ्यासोबत असेल. एका शब्दात सांगायचे तर मला एक संदेश पोचवायचा आहे. "साऱ्या जगाशी गोड वागत राहण्याइतकी मला सवड नाही, शिवाय गोड वागण्याचा प्रत्येक प्रयत्न हा मला ढोंगी बनवू पाहतो. पाण्यातील एक क्षुद्र मासा होऊन जिवंत राहणे आणि मूर्ख लोकांच्या हरएक मागणीपुढे मान तुकवणे, यापेक्षा एक हजार वेळा मरण्यासाठी तयार असणे मी पत्करेन."
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
(विश्वमानव विवेकानंद , खंड दुसरा मधून.
लेखक- वि. रा.करंदीकर )
0 comments:
Post a Comment