1/07/2021

संत वाणी

जागृत होई आत्मयरामा ।
अनामा सच्चितसुखघनधामा ।।

गुरु साक्षात परब्रम्ह ।
अखिल व्यापूनी उरलासी ।। धृ ।।

आरतीच्या या ध्रुवपदात सद्गुरू पिठले महाराज प्रत्येकाचे अंतस्थ आत्मारामाला जागृत करण्याचे आवाहन करत आहेत. 

प्रत्येक जण स्वतःला शरीर व मन समजत आहे, हे अज्ञान आहे, ही आत्मस्वरुपाप्रति निद्रा आहे. उठा, जागे व्हा म्हणजे तुम्ही शरीर-मन नसुन प्रत्यक्ष परब्रम्ह, आत्माराम आहात हे समजुन घ्या ! इश्वराचा शोध तुमच्या आत घ्या बाहेर नाही. येशु ख्रिस्त म्हणतात स्वर्गाचे राज्य तुमच्या आत आहे, बुद्ध सांगतात तटस्थ राहून मनातील भाव-भावनांचे निरीक्षण करा, जैन धर्मात महावीरही आत वळायलाच सांगताहेत ! 

स्वामी सतत म्हणायचे-अरे कस्तुरी मृग बेभान होवुन फीरतोय पण स्वतःच्या आतुन सुगंध येतोय हे जाणत नाही ! त्याप्रमाणे तुम्ही-आम्ही स्वतःच्या आतील इश्वराला विसरून त्याला बाहेर शोधतोय ! तेंव्हा इश्वराचा शोध आपापल्या आत घ्या कारण तुम्हीच स्वतः परब्रम्ह आहात! 

पुढे आपल्या सर्वांच्या आत्मरुपाचे वर्णन ते करतात-त्या स्वरूपाला कुठलेही नाव, रंग, आकार, रुप, जात-धर्म-लिंग काही नाहीये. परंतु सत् म्हणजे ते आहे, चित् म्हणजे ते चैतन्यच आहे आणि ते घनदाट सुखाने भरलेले एकमेव असे आश्रयाचे धाम आहे आणि तेथेच आपल्याला आराम मिळेल! 

गुरु साक्षात परब्रम्ह याचा अर्थ आपण जाणतो, तो अर्थ आहेच, परंतु पिठले महाराजांनी हे शब्द आपल्या अंतस्थ आत्मारामाचे वर्णन करण्यासाठी काढले आहेत, कोणत्या गुरु साठी नाही ! येथे थोडा विचार करावा, जर गुरु साक्षात परब्रम्ह आहे आणि तो समस्त चराचराला व्यापुन उरलाय तर मग आपण सर्व चराचरामध्ये सामील आहोतच, तर तोच परब्रम्ह गुरु तुम्हा-आम्हाला अंतर्बाह्य व्यापुन आहे म्हणजे आपण सर्वं परब्रम्हस्वरूपच आहोत हे पिठले महाराजाना या ध्रुवपदात सुचवावयाचे आहे !

तुमचे-आमचे अंतस्थ स्वरुप हेच सद्गुरू आहे आणि तेच परब्रम्ह आहे, प्रत्येकाने आपल्या आत्मारामाचीच भक्ती करावी, भक्ती म्हणजे जो विभक्त नाही तो-इश्वरापासुन स्वतःला वेगळा न मानणे- तीच गुरूची, परब्रम्हाची खरी भक्ती आहे, हे पिठले महाराजांना सुचवायचे आहे 

इराकमधील सुफी संत राबिया एके दिवशी गल्लीमध्ये काहीतरी शोधू लागली, सर्व गल्ली तीच्या शोधात सामील झाली. खूप वेळाने एकाने विचारले, राबीया, तु काय शोधते आहेस? राबीया म्हणाली सुई शोधते आहे, त्याने परत विचारले, सुई हरवली कोठे आहे? राबीया म्हणाली घरामध्ये ! यावर सर्वजण राबीयाच्या वेडेपणाबद्दल हसु लागले. मग राबीया त्यानां म्हणाली-अरे वा तुम्ही सर्व शहाणे दिसताय, मग आत असलेला परमात्मा बाहेर का शोधतायरे वेड्यासारखा ? यावर सर्व जण चूप झाले !

मुख्य दिशा चार, उपदीशा चार, वर आणि खाली दोन अश्शा दहाच दिशा आपल्याला माहीत आहेत, कोणत्याही धार्मिक विधीमध्ये आपण या दहा दिशांना अक्षता टाकून नमस्कार करतो परंतु स्वतःच्या आत म्हणजे अकरावी दिशा आपण कधीच विचारात घेत नाही ! कदाचित त्यामुळेच वारकरी संप्रदायात एकादशी करण्याची प्रथा असेल कारण एकादशी म्हणजे अकरावी तिथी, अकरावी दिशा-आत शोधा ! त्या दिशेकडे फक्त खरे सद्गुरूच तुम्हाला आम्हाला वळवु शकतात, आणि ती आत्मारामाची दिशाच पिठले महाराज दाखवत आहेत जी अंधाराकडून प्रकाशाकडे आणि मृत्यु कडून अमरत्त्वाकडे नेते.

#श्रीस्वामी_समर्थ 
#श्रीगुरुदेव_दत्त

0 comments:

Post a Comment