श्रीब्रह्मचैतन्य श्रीगोंदवलेकर महाराजांचा नामबोध
२६ ऑगस्ट
कारणावाचून आनंद, तो खरा.
जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे. जगणे हे आनंददायक आहे, मग आपल्याला दुःख का होते ? मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो. वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रूप अशाश्वत असते. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. आनंद हा अर्थात अशाश्वत असणार, म्हणून तो खरा आनंद नाही. कारणाशिवाय आनंद मिळवण्यासाठी अगदी स्वस्थ बसायला शिकावे. हे 'काहीही न करणे' ही फारच उच्च अवस्था आहे. काहीतरी करण्यापेक्षा ती फारच कठीण आहे. भगवंताशी अगदी अनन्य होणे, आपले कर्तेपण पूर्ण मारणे, ही ती अवस्था आहे. आनंद पाहिजे असेल तर तुम्ही आनंदातच राहा ! कशाही परिस्थितीत आनंद राहावा. आपल्या मनासारखी गोष्ट घडून आली तर समाधान वाटावे. काल जे झाले त्याबद्दल दुःख करू नये, उद्या काय होणार याची काळजी करू नये, आज मात्र आनंदात आपले कर्तव्य करावे आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावे. यातच सर्व आले.
भगवंताची प्राप्ती व्हावी असे वाटणे हे जन्माचे सार्थक आहे.
|| हरये नम: | हरये नम: | हरये नम: ||
साभार : अविनाश नगरकर जी
0 comments:
Post a Comment